कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने यावर्षीच्या ऊस गाळप हंगामातील १५ जानेवारी पासूनची शेतकऱ्यांची थकीत दिले अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग न केल्यामुळे गुरुवारी रयत क्रांती संघटनेच्यावतीने सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक विश्वजीत शिंदे यांना कारखान्याने आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांची थकीत बिले बँकेत जमा करावीत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे नेते व ऊसदर नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिन नलवडे यांनी दिला आहे. यावेळी संघटनेकडून कारखाना व्यवस्थापनाला निवेदनही देण्यात आले.
सह्याद्री सहकारी साखर कारखाना तसेच जिल्ह्यातील इतर बऱ्याच कारखान्याने अद्यापही ऊस बिले न दिल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रयत क्रांती संघटना आक्रमक झाली असून प्रत्येक कारखान्याला रयत क्रांतीच्यावतीने निवेदन देण्यात येऊन आंदोलनाचा इशारा दिला जात आहे. त्यानुसार गुरुवारी संघटनेने सह्याद्री कारखान्यास निवेदन देऊन शेतकऱ्यांची ऊस बिले त्वरित देण्याची मागणी केली. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक विश्वजीत शिंदे यांनी येत्या ७ ते ८ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती ऊस बिले वर्ग करण्याचे आश्वासन संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे नेते व ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिन नलवडे, रयत क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष विशाल पुस्तके, नितीन कुलकर्णी, सौरभ चव्हाण, सुभाष नलवडे, बबन पवार, अनिल डुबल, सचिन नांगरे, शंकर आतकरे, रणजीत थोरात व शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांची बिले थकवणाऱ्या कारखान्यावर आंदोलन होणार !
"जिल्ह्यातील सर्व कारखान्यांना टप्प्याटप्प्याने निवेदन देण्यात येणार आहे. कृष्णा सह रयत-अथणी शुगर्सने शेतकऱ्यांचे थकीत पैसे जमा केले आहेत. त्यामुळे इतर कारखान्यांनीही शेतकऱ्यांची थकीत देणी त्वरित द्यावीत. अन्यथा रयत क्रांती संघटना त्यांच्या कारखानावरती तीव्र आंदोलन करणार आहे."
-- सचिन नलवडे,
सदस्य, ऊस दर नियंत्रण मंडळ.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#रयतक्रांतीसंघटना #सचिननलवडे #KaradNews
#ChangbhalaNews #चांगभलंन्यूज
#ऊसदरआंदोलन #सातारा #SataraNews


0 टिप्पण्या