एनपीएचे १.८५ टक्क्यांवर : डिजिटल सेवा विस्तारासोबत चार नव्या शाखांचे नियोजन
कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
येथील जनकल्याण पतसंस्थेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय आर्थिक कामगिरी नोंदवत आपली विश्वासार्हता अधिक दृढ केली आहे. ठेवी, कर्जवाटप आणि नफ्यात झालेली वाढ ही संस्थेच्या सक्षम नियोजनाची साक्ष देणारी ठरली आहे.
संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेकडे ५९५ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. तर ३६४ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले असून, विविध बँकांमध्ये ३१७ कोटी रुपयांची सुरक्षित गुंतवणूक करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत एकूण व्यवसायात २२ कोटी रुपयांची वाढ झाली असून, संस्थेला ७ कोटींपेक्षा अधिक नक्त नफा मिळाला आहे. नियोजनबद्ध कर्जवाटप व काटेकोर वसुलीमुळे एनपीएचे प्रमाण केवळ १.८५ टक्क्यांवर राखण्यात यश आल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
सभासदांच्या सोयीसाठी संस्थेने डिजिटल सेवांवर भर देत मोबाईल बँकिंग, युटिलिटी पेमेंट्स, फास्टॅग, क्यूआर कोड, आरटीजीएस, एनईएफटी तसेच प्रीपेड डेबिट कार्ड यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. येत्या काही महिन्यांत UPI सेवा सुरू करण्याचेही नियोजन आहे. याशिवाय, विमा क्षेत्रात प्रवेश करत जनरल व लाईफ इन्शुरन्स योजनांद्वारे वाहन, आरोग्य, औद्योगिक व टर्म इन्शुरन्स सुविधा सभासदांना देण्यात येत आहेत.
उपाध्यक्ष अभिजीत चाफेकर यांनी सांगितले की, नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदारांना प्रोत्साहन म्हणून संस्थेने गेल्या १५ वर्षांत ८.३२ कोटी रुपयांचा व्याज परतावा (रिबेट) दिला आहे. चालू वर्षातील रक्कमही लवकरच सभासदांच्या खात्यात जमा केली जाणार असून, ही योजना पुढेही सुरू ठेवली जाणार आहे.
आगामी काळात बारामती, कोथरुड, गडहिंग्लज आणि तासगाव येथे नवीन शाखा सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. संस्थेच्या या प्रगतीत सभासदांचा मोठा वाटा असल्याचे नमूद करत अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी संस्थेचे संचालक व अधिकारी उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#जनकल्याणपतसंस्था #Karad #KaradNews
#ChangbhalaNews #SataraNews
#चांगभलंन्यूज


0 टिप्पण्या