चांगभलं प्रतिनिधी | कराड प्रतिनिधी
ज्येष्ठ संशोधक व पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत शेतकरी कामगार पक्ष (शे.का.प.), राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) आणि बळीराजा शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कराड येथील कोल्हापूर नाका परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर रास्ता रोको आंदोलन व निदर्शने करण्यात आली. आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची दखल घेण्याची मागणी केली. आंदोलनकर्त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्न आणि स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली.
शे.का.प.चे जिल्हाध्यक्ष भाई अॅड. समीर देसाई यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सोनम वांगचुक हे देशाच्या भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी संघर्ष करत आहेत. मात्र केंद्र सरकार त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारचे धोरण उद्योगपतींच्या हिताचे असल्याचा आरोप करत त्यांनी शेतमालाला हमीभाव, वाढत्या इंधनदरांचा प्रश्न आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा याकडेही लक्ष वेधले. "सोनम वांगचुक हे कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे, तर देशातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल व्हावा यासाठी आंदोलन करत आहेत," असे ते म्हणाले.
देसाई यांनी सोनम वांगचुक यांच्या कार्याचा उल्लेख करत सांगितले की, ते एक ख्यातनाम संशोधक असून त्यांनी लडाखसारख्या अत्यंत थंड प्रदेशात लष्करासाठी कमी खर्चातील आणि उणे १५ अंश सेल्सिअस तापमानातही वापरता येईल असा टिकाऊ तंबू विकसित केला आहे. त्यांच्या विविध संशोधनांचा देशाला मोठा फायदा झाला असून, अशा व्यक्तीच्या आंदोलनाकडे सरकारने गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
बळीराजा शेतकरी संघटनेचे चंद्रकांत यादव यांनी सरकारने आंदोलनावर तातडीने तोडगा काढावा, तसेच शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली. स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
बळीराजा शेतकरी संघटनेच्या युवक प्रदेशाध्यक्षांनीही सरकारला इशारा देत सांगितले की, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला देशभरातील विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. सरकारने वेळीच सकारात्मक भूमिका घेतली नाही, तर जनआंदोलन अधिक तीव्र होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनात प्रल्हाद माने, संदीप तिकवडे, भाई हैबतराव पवार, आनंदराव (चेअरमन) थोरात, हुबाळे साहेब, जगताप यांच्यासह शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष आणि बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी काही काळ रास्ता रोको करत वाहतूक रोखली आणि केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणी केली.
➖➖➖➖➖➖➖
#सोनमवांगचुक #रास्तारोकोआंदोलन #शेकाप #रासप #बळीराजा
#चांगभलं #चांगभलंन्यूज #चांगभलंसाप्ताहिक #साप्ताहिकचांगभलं


0 टिप्पण्या