कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
शेवाळेवाडी (म्हासोली), ता. कराड येथील अथणी शुगर्स (रयत युनिट) या साखर कारखान्याने गळीत हंगाम सन २०२५-२६ मध्ये गाळप केलेल्या संपूर्ण ऊसाचे बिल ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले असल्याची माहिती मॅनेजिंग डायरेक्टर श्री. श्रीनिवास पाटील यांनी दिली.
या हंगामात कारखान्याने एकूण ४,१९,८०८ मे.टन ऊस गाळप केले असून शेवटच्या पंधरवड्यात गाळप झालेल्या ऊसाला प्रति मे.टन ३५०० रूपये दराने बिल अदा करण्यात आले आहे. यानुसार एकूण १४६.९३ कोटींची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे.
यावेळी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. उदयसिंहदादा पाटील, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर व सी.एफ.ओ. श्री. योगेश पाटील तसेच युनिट हेड श्री. रविंद्र देशमुख उपस्थित होते.
कारखान्याने यावर्षी विस्तारीकरणाचे काम पूर्ण करून वाढीव क्षमतेने गाळप केले असून सहवीज निर्मिती प्रकल्पही कार्यान्वित करण्यात आला आहे. ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल चेअरमन उदयसिंह पाटील यांनी आभार व्यक्त केले. मात्र, अवेळी पावसामुळे हेक्टरी उत्पादन घटल्याने उद्दिष्टापेक्षा कमी गाळप झाल्याचे त्यांनी नमूद केले.
या यशस्वी हंगामासाठी अथणी शुगर्सचे चेअरमन श्रीमंत पाटील, रयत कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर व सी.एफ.ओ. योगेश पाटील, युनिट हेड रविंद्र देशमुख, तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी, ऊस पुरवठादार शेतकरी व तोडणी-वाहतूक कंत्राटदार यांचे मोलाचे योगदान लाभले.
पुढील हंगामातही असेच सहकार्य मिळावे, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#Rayat_AthaniSugar #ऊसबिल #रयतसाखर
#ऊसउत्पादक #उदयसिंहपाटील #ChangbhalaNews
#चांगभलंन्यूज #KaradNews

0 टिप्पण्या