कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराड शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री कृष्णामाईच्या चैत्री यात्रा महोत्सवाची गुरुवारी सायंकाळी भव्य आणि पारंपरिक पालखी मिरवणुकीने उत्साहात सुरुवात झाली. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार असून, सोमवारी (दि. ६) मुख्य सोहळा रंगणार आहे.
हनुमान जयंतीच्या शुभदिनी सायंकाळी श्रीकृष्ण दत्तात्रय आवटे (पुजारी) यांच्या निवासस्थानातून ‘श्रीं’ची सवाद्य पालखी मोठ्या भक्तिभावाने निघाली. सुवासिनींच्या पारंपरिक पूजनाने मिरवणुकीला प्रारंभ झाला. ढोल-ताशांच्या निनादात आणि जयघोषात निघालेली ही पालखी शहरातील प्रमुख मार्गांवरून जात कृष्णा-कोयना नद्यांच्या पवित्र संगमावरील कृष्णा घाटावर पोहोचली.
घाटावर उभारलेल्या मंडपात पालखीचे विधिवत स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. त्यानंतर ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, पुढील काही दिवस मंदिर परिसरात पूजाअर्चा, कीर्तन, भजन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला असून, कराडकरांसह बाहेरील भाविकांचीही मोठी उपस्थिती अपेक्षित आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#KaradNews #ChangbhalaNews #Karad

0 टिप्पण्या