नैसर्गिक कॉरिडॉरमुळे वाघांचे स्थलांतर वेगात; संवर्धनासह पर्यटनालाही नवी संधी
कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
पश्चिम महाराष्ट्रातील जैवविविधतेचा महत्त्वाचा पट्टा मानल्या जाणाऱ्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यात वाघांच्या उपस्थितीबाबत मोठी सकारात्मक घडामोड समोर आली आहे. STR-07 आणि STR-08 या दोन प्रौढ नर वाघांनंतर आता STR-10 या नव्या नर वाघाचीही नोंद झाली असून त्याला ‘राणोजी’ असे नाव देण्यात आले आहे.
वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅप्स, पगमार्क्स आणि वैज्ञानिक विश्लेषणाच्या आधारे या वाघांची ओळख निश्चित करण्यात आली आहे. STR-10 ‘राणोजी’ सध्या राधानगरी परिसरात आपली स्वतंत्र टेरिटरी निश्चित करत असल्याचे दिसून आले आहे.
या नव्या नोंदीमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या आता १० वर पोहोचली असून त्यामध्ये ७ नर व ३ मादी वाघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या भागात नैसर्गिक स्थलांतरातून स्थायिक होणाऱ्या वाघांची संख्या वाढत असल्याने संवर्धनाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
सावंतवाडी–दोडामार्ग ते राधानगरी हा नैसर्गिक वन्यजीव कॉरिडॉर वाघांच्या मुक्त संचारासाठी उपयुक्त ठरत असून, यामुळे त्यांच्या प्रजातींच्या टिकावासह जनुकीय विविधता राखण्यास मदत होत आहे. वन विभागाकडून वाघांच्या हालचाली, पाणवठे व अधिवास यांचा सखोल अभ्यास सुरू असून भविष्यातील संवर्धन आराखड्यास याचा फायदा होणार आहे.
दरम्यान, केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात एकूण ५ मादी व ३ नर वाघ सोडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी दोन मादी ताडोबा तर एक पेंच येथून आणण्यात आल्या आहेत. सध्या नर वाघांची संख्या अधिक असल्याने वंशवृद्धीसाठी मादी वाघीणांची गरज अधोरेखित होत आहे.
“भविष्यात एखादी मादी वाघीण ताडोबा मधून राधानगरी मध्ये सोडल्यास राधानगरी मध्ये वंशवृद्धी होईल व पर्यटन चालना मिळेल.”
— रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक
वाघांमुळे राधानगरी ‘इको-टुरिझम’चे नवे केंद्र...
राधानगरी परिसरात वाढती वाघांची संख्या ही केवळ संवर्धनापुरती मर्यादित न राहता पर्यटनासाठीही मोठी संधी निर्माण करत आहे. नैसर्गिक अधिवास, दाट जंगल आणि समृद्ध जैवविविधता यामुळे हा भाग निसर्गप्रेमींसाठी आकर्षण ठरत आहे. नियोजनबद्ध इको-टुरिझम विकसित केल्यास स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
सह्याद्रीतील ‘दहाचा टप्पा’; आतापर्यंत ओळखलेले वाघ...
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या आता १० वर पोहोचली असून त्यात ७ नर आणि ३ मादी वाघांचा समावेश आहे. या वाघांना ‘सेनापती, सुभेदार, बाजी, चंदा, तारा, हिरकणी, रायबा, सरदार, शिलेदार आणि राणोजी’ अशी ओळख देण्यात आली आहे. वाढती संख्या आणि स्थिर अधिवास यामुळे सह्याद्रीतील संवर्धन प्रयत्नांना यश मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.

0 टिप्पण्या