कराडला २० व्या यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन
कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
वीस वर्षांपूर्वी स्वर्गीय विलासराव पाटील (काका) यांनी कराडसह सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, या उद्देशाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाची मुहूर्तमेढ रोवली. शेतकऱ्यांना दरवर्षी काहीतरी नवीन देण्याची ही परंपरा आजही कायम असून या प्रदर्शनाचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होत आहे, असे गौरवोद्गार राज्याचे पर्यटन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी काढले.
कराड कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद व महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विसावे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन ना. शंभूराज देसाई यांच्या हस्ते फीत कापून व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष खा. नितीनकाका पाटील, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, आमदार नरेंद्र पाटील, कराडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, रयत साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील, राष्ट्रवादी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, कार्यकारिणी सदस्य विजयसिंह यादव, युवा नेते आदिराज पाटील–उंडाळकर, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री पवार-फरांदे, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक, आत्माचे प्रकल्प संचालक अजय शेंडे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, पशुसंवर्धनचे जिल्हा उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी समीर पवार, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना. शंभूराज देसाई पुढे म्हणाले, देश व राज्य कृषीप्रधान असून शेतकरी बळकट झाला तरच अर्थव्यवस्था मजबूत होईल. यंदाच्या प्रदर्शनात कृषी क्षेत्रातील ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानावर विशेष भर देण्यात आला आहे. आज ९० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असल्याने या तंत्रज्ञानाचा मोठा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
खा. नितीनकाका पाटील म्हणाले, सातारा व परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, या उद्देशाने स्वर्गीय विलास काकांनी दूरदृष्टीने या प्रदर्शनाची सुरुवात केली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती हेच या प्रदर्शनाचे यश आहे. यावर्षी एआय तंत्रज्ञानावर दिलेला भर कौतुकास्पद आहे. सातारा जिल्हा बँकेच्या माध्यमातून बारामती कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने जिल्ह्यातील दोन हजार शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, शेतीतील बदल व आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचावे, यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरत आहे. यंदा एआय तंत्रज्ञानावर दिलेला भर शेतकऱ्यांसाठी निश्चितच लाभदायक ठरेल.
प्रारंभी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सभापती सतीश इंगवले यांनी प्रास्ताविक केले तर उपसभापती नितीन ढापरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास बाजार समितीचे सर्व संचालक, प्रभारी सचिव आबासो पाटील व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचा विशेष सत्कार
कराडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचा निवडीबद्दल पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी खा. नितीनकाका पाटील, आ. मनोज घोरपडे, आ. नरेंद्र पाटील, अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर उपस्थित होते.
तसेच कराडचे नवनिर्वाचित नगरसेवक विजयसिंह यादव व मलकापूर पालिकेचे राष्ट्रवादी पुरोगामी आघाडीचे नगरसेवकांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#कराड #KaradNews #YashvantraoChavanKrushipradarshan
#कृषीप्रदर्शन #ChangbhalaNews #चांगभलंन्यूज




0 टिप्पण्या