'दक्ष कराडकर'चा मुख्याधिकाऱ्यांकडे पाठपुरावा
कराड प्रतिनिधी |चांगभलं वृत्तसेवा
कराड नगरपरिषद अंतर्गत कार्यरत जलशुद्धीकरण विभागातील तब्बल ४६ कर्मचाऱ्यांचा मागील दोन महिन्यांचा पगार अद्याप थकीत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना प्रत्येकी सुमारे २०,७०० रुपये मासिक वेतन देण्यात येते. त्यानुसार दोन महिन्यांची एकूण थकीत रक्कम जवळपास २० लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दक्ष कराडकर सामाजिक ग्रुपचे मंगळवार पेठ येथील श्री. प्रमोद श्रीकृष्ण पाटील यांनी मुख्याधिकारी, कराड नगरपरिषद यांना दिलेल्या निवेदनात ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. निवेदनात म्हटले आहे की, संबंधित कर्मचारी २४ तास पाणी शुद्धीकरण व पुरवठा व्यवस्थेची जबाबदारी पार पाडत असतानाही त्यांना नियमित वेतन मिळत नसल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
पाणीपुरवठा ही शहरातील अत्यावश्यक सेवा असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांचा पगार थकीत राहिल्यास त्यांच्या मनोबलावर परिणाम होऊन असंतोष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे भविष्यात कोणत्याही क्षणी पाणीटंचाईसारखी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका नाकारता येत नाही.
दरम्यान, जलशुद्धीकरण विभागातील ४६ कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १५ कर्मचाऱ्यांना कर वसुलीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पाणीपुरवठ्यासारख्या जीवनावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना अन्य कामांसाठी राबवणे कितपत योग्य आहे, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.
सदर बाबीची तात्काळ दखल घेऊन थकीत वेतन त्वरित अदा करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे 'दक्ष कराडकर'कडून करण्यात आली आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे कराडकरांचे लक्ष लागले आहे.
#KaradCity #ChangbhalaNews #Karadkar

0 टिप्पण्या