कराड प्रतिनिधी |चांगभलं वृत्तसेवा
जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यालयात ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रमुख अतिथी म्हणून मराठी भाषा अभ्यासक श्री.प्रशांत लाड उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रशांत लाड, जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. शिरीष गोडबोले, दीपक कुलकर्णी यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठी भाषा अभ्यासक व लेखक श्री. प्रशांत लाड यांचा परिचय समन्वयक श्री. विजय कुलकर्णी यांनी करून दिला. अध्यक्ष शिरीष गोडबोले यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून शाळेने आयोजित केलेल्या ' पन्हाळा ते पावनखिंड ऐतिहासिक अभ्यास पदभ्रमंती मोहीम' या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पन्हाळा ते पावनखिंड या मोहिमेचे इयत्ता नववी च्या विद्यार्थ्यांना आलेले अनुभव व प्रवास वर्णन तसेच पालक अभिप्राय यांचे संकलन करून पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.
मराठी बोली भाषेचे महत्व विशद करताना मराठी लेखकांचे योगदान, कराड शहरातील लेखकांचे भाषा समृद्धीसाठी केलेले लेखन यावर प्रकाश टाकला. तसेच ‘कराड शहराची समृद्ध बोलीभाषा’ या विषयावर प्रशांत लाड यांनी अभ्यासपूर्ण विचार मांडले.
विद्यार्थी वक्ता म्हणून श्रीवेद कुलकर्णी याने ‘अभिजात मराठी भाषा’ यावर भाषण केले.
मराठी साहित्यातील अनेक भागांवर प्रकाश टाकणारा वैविध्यपूर्ण कार्यक्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केला. समूह गीत, सामुहिक उतारा वाचन, काव्य सादरीकरण, नाट्यछटा, अभंग गायन, मराठी भाषेच्या चारोळ्या, मराठी म्हणी आणि त्यांचे नाटकीय सादरीकरण, मराठी गीतावर आधारित नृत्य असे कार्यक्रम सादर करण्यात आले.
शौर्य काशीद, प्राची जोशी, रिया पाटील, परिणीती यादव, अनघा पवार , चार्वी माने, समर्थ शिवशरण, चैत्राली माने, आराध्या बकरे श्रवण जंगम, सई पवार जान्हवी शिंदे,यश आफळे या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सादरीकरण सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजलक्ष्मी शेटे व श्रेयस कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी केले. आभार सरस नलवडे याने मानले. कार्यक्रम आयोजनासाठी मुख्याध्यापिका सौ. सोनाली जोशी यांनी मार्गदर्शन केले तर सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रुपाली तोडकर या उपस्थित होत्या. सुवर्णा काटकर, दीपक पाटील,गौरी जाधव यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले तर स्वाती जाधव यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. ‘पसायदान’ म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


0 टिप्पण्या