चांगभलं प्रतिनिधी | कोल्हापूर
भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा आज कोल्हापूर येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्यास सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील असंख्य कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संपतराव (बापू) पवार पाटील होते.
यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष ॲड. समीर देसाई, बाबुराव लगारे सर, भारत पाटील, बाबासाहेब देवकर, भाई ॲड. हैबतराव पवार, मारुतीराव जाधव, दिनकरराव गुरव, युवराज मस्के यांच्यासह सातारा जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
मेळाव्यात बोलताना जिल्हाध्यक्ष ॲड. समीर देसाई म्हणाले की, शेतकरी कामगार पक्ष हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून सर्वसामान्य, बहुजन, कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारा पक्ष आहे. दिल्ली येथील जंतर-मंतर वरील आंदोलनानंतर देशातील जनतेचा प्रस्थापित राजकारण विरोधातील रोष स्पष्टपणे दिसून येत असून, आगामी काळात मोठ्या प्रमाणावर युवक युवती शेतकरी कामगार पक्षाकडे आकर्षित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पश्चिम महाराष्ट्रातील साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे सांगत, शेतकऱ्यांच्या उसाला न्याय्य आणि योग्य हमीभाव मिळावा यासाठी जीवनावश्यक वस्तू कायद्यात बदल करण्याची गरज आहे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळाल्याशिवाय त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होणार नाही, असेही ते म्हणाले.
शेतकरी कामगार पक्षाचा गौरवशाली इतिहास हा शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी लढण्याचा राहिला आहे. आजही शेतकऱ्यांसमोर अनेक गंभीर प्रश्न उभे असून, ते सोडवण्यासाठी तरुणांनी मोठ्या संख्येने शेतकरी कामगार पक्षात सहभागी होऊन परिवर्तनाच्या चळवळीत योगदान द्यावे, असे आवाहन ॲड. समीर देसाई यांनी केले.
मेळाव्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून, पश्चिम महाराष्ट्रात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
➖➖➖➖➖➖➖➖

0 टिप्पण्या